CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी कृती आराखडा करा- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे निर्देश
ठाणे : नागरिकांच्या आरोग्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा महत्वाचा असून जिल्ह्यामध्ये त्याची प्रभावी अमंलबजावणी करावी. 7 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहिम राबवून अन्न, खाद्यपदार्थ व्यावसायिकांना या कायद्यातंर्गत परवाना आणि नोंदणी प्रमाण देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी येथे सांगितले.
या कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक गुरूवारी झाली. त्यावेळी श्री. नार्वेकर बोलत होते. यावेळी सहायक आयुक्त (अन्न) धनंजय काडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, ठाणे महापालिका उपायुक्त अश्विनी वाघमळे, ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयातील प्रकाश निलेवाड, डॉ. गिरीश चौधरी, ठाण्याचे सहायक आयुक्त (अन्न) अशोक पारधी, दिगंबर भोगावडे, ग्राहक संरक्षण सेवा समितीचे उपाध्यक्ष गजानन पाटील, व्यापारी असोशिएशनचे विजय ताम्हाणे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर म्हणाले, अन्न सुरक्षा व मानके कायदा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा.ग्राहक व व्यापारी संघटनांनी याबाबत मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती करावी. त्याचबरोबर ‘एफएसएसएआय’च्या उपक्रमात संस्थांनी सहभागी होऊन मानांकन प्राप्त करून घ्यावे,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
खाद्य व अन्न पदार्थ व्यावसायिकांना कायद्यांतर्गत परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे सहायक आयुक्त श्री. काडगे यांनी यावेळी सांगितले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कोकण विभागाचे सह आयुक्त एस. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान नोंदणी प्रमाणपत्र देण्याची विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे श्री. काडगे यांनी सांगितले.
यावेळी ‘ईट राईट स्मार्ट सिटी, क्लिन स्ट्रीट फुड हब, स्वच्छ फळे व भाजीपाला बाजारपेठ आदी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.