CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे दि. ८ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व जोखीम प्रवण महिलांना समृद्ध आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण’ अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या ग्रामसंघानी ( बचतगट ) उद्योग- व्यवसाय करावा यासाठी कायमस्वरूपी अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आज महिला दिनाचे औचित्य साधत प्रातिनिधिक स्वरुपात प्रेरणा महिला संघ, श्रावणी महिला ग्रामसंघ, शिवकन्या महिला ग्रामसंघाना अनुक्रमे ३ लाख ६० हजार आणि ३ लाखाच्या धनादेश स्वरुपातल्या निधीचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषि,पशू व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, जिल्हा परिषद सदस्य रुपाली झुगरे, वैशाली शेवाळे, जयश्री सासे, उपस्थितीत होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियानाची अमलबजावणी ठाणे जिल्ह्यात सन २०१७ पासून सर्व तालुक्यात इंटेन्सिव पद्धतीने सुरू आहे. ग्रामीण महिलांचे सामाजिक तसेच आर्थिक समावेशन करून महिलांचे सक्षमीकरण करणे हा प्रामुख्याने या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत महिलांचे गावात गट निर्माण करून त्यांचे गावपातळीवर ग्रामसंघ तयार केले जातात. सध्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात एकूण १०६२२ गट ७९३ ग्रामसंघ व २९ प्रभागसंघ आहेत. या महिला एकत्रितपणे विविध लघु उद्योग- व्यवसाय करतात. यामध्ये भाजीपाला लागवड, दुकान व्यवसाय, खाद्यपदार्थ व्यवसाय, शेती निगडीत व्यवसाय, घरपयोगी व्यवसाय असे नानाविध उपजीविकेचे व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावतात.