CRIME BORDER | 27 December | 01:17 PM
खेड : भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, समता, बंधुता, एकता आणि एकात्मता या लोकशाही मूल्यांसाठी आग्रही राहणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी जनसामान्यांनी घेतलेली बंडखोर भूमिका वर्तमान व भविष्य काळात निर्णायक राहणार असल्याचे प्रतिपादन प्रबोधन विचार मंचाचे समन्वयक श्रीकांत जाधव यांनी व्यक्त केले.यावेळी अनिल तांबे , किशोर कासारे सर ,भा.ला.टूले , विशाल जाधव, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक शांताराम पवार, मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक राजेश मर्चंडे विचार मंचाचे उपाध्यक्ष रंजन येलवे ,कार्याध्यक्ष सूर्यकांत जाधव ,कोषाध्यक्ष स्वानंद जाधव आदी मंडळी उपस्थित होते.
गावभेट हा अभिनव उपक्रम प्रबोधन विचार मंच, मंडणगड या समाज प्रबोधनकारी संस्थेकडून राबवण्यात येतो.सुर्ले या गावी आजची चिंतनात्मक वैचारिक बैठक असलेली गावभेट संपन्न झाली. अखिल भारतीय समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक पैलूंवर विचारमंथन करणे, समाजाशी संवाद प्रस्थापित करणे,वर्तमान प्रभावित मुद्दे आणि त्याची कारणमीमांसा करणे , मानवतावाद आणि विवेकवाद याचा प्रसार करणे हा गावभेटीचा मूळ उद्देश आहे
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री जाधव म्हणाले की,शेतकरी, मजूर स्त्रिया, शोषित, पीडित आदी मंडळींचा जीवन संघर्ष अधिक भयावह झालाय. आज देशाचे संविधान व लोकशाही व्यवस्था याला अर्थहीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक पातळीवर भारत हा अंशिक स्वातंत्र्य या गटात आल्याने भारताच्या लोकशाही व्यवस्था आणि लोकांचे स्वातंत्र्य हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.थोडक्यात आज सामान्य भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकाराना धोका निर्माण झाला आहे इतकं वातावरण दूषित केले जात आहे. अशा वेळी फुले, शाहू आंबेडकरवाद प्रचारीत करणाऱ्या समतावादी आणि लोकशाहीप्रेमी मंडळींनी समतेसाठी बंडखोरी करीत संघर्ष करणे ही काळाची गरज आहे.