CRIME BORDER | 27 December 2025 | 08:00 PM
सकाळी छान पाऊस होता. गॅलरीत चहा प्यायला मजा येत होता. इतक्यात, माझी नजर, समोरच्या चाळीत गेली. काहीजण कौलावर चढून निळे प्लास्टिक टाकत होते. ते वा-याने उडू नये म्हणून बांधून ठेवत होते. हे दृष्य पाहताना माझे मन वेगाने मागे गेले......
मला गिरगावातील माझी चाळ आठवली. सध्या तिथे मॅंगलोरी कौलं आहेत पण पुर्वी ज्याला आम्ही नळे म्हणायचो तशी कौलं असायची. पाऊस येण्यापुर्वी दर चार पाच वर्षांनी ती परतवली जायची. या कौलं परतवणा-यांची एक टीम असायची, ते ही कामे करायची. तो एक मोठा कार्यक्रमच असायचा. चाळीच्या एका टोकापासून तो सुरू व्हायचा दुस-या टोकापर्यंत यायला त्यांना साधारण दोन ते तीन महिने लागायचे. काही रीपा (कौलं रचण्यासाठी जी लाकडांची चौकट असते त्यांना रीपा म्हणतात) तुटल्या असतील तर त्या बदलल्या जायच्या. ज्या घरावरची कौलं परतवत असतील, त्यांच्या शेजारच्या घरातून त्यांना जेवण, चहा, नाश्ता, वगैरे दिला जायचा. आधीच्या घराचं काम सुरू झालं, की नंतरच्या घरात सामान झाकून ठेवण्याची धावपळ सुरू व्हायची. कारण खूप कचरा पडायचा. सगळे नळे उतरवल्यावर घरातून मोकळं आकाश दिसायचं. तो एक वेगळाच अनुभव होता. जोरात पाऊस सुरू झाला की काही ठिकाणी पाणी गळायचं, मग काठी घेऊन नळे सरकवायचे आणि पाणी पडणार नाही म्हणून धडपड करायची. आज ते समोरचं दृश्य पाहिलं आणि बालपणीचा पावसाळा आठवला.
आता निवांत! गॅलरीत बसून पाऊस बघता येतो.खरंच! जग किती बदललंय आमचं.....
- डी.एम.कांबळी