CRIME BORDER | 27 December 2025 | 08:00 PM
काल परवा वटपौर्णिमा सण अगदी उत्साहात साजरा झाला. हिंदू धर्मात पतिव्रता स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी भक्ती भावाने वडाच्या झाडाची पूजा करतात. पुढील सात जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करतात. आता हा प्रत्येकाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा भाग आहे. आता ह्या पूजेमुळे इतर माणसांना किंवा पर्यावरणाला काही नुकसान होत असेल असं मला तरी वाटत नाही. आता वडाच्या फांद्या तोडून घरी न आणता प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी ह्या मताची मी आहे. आजकाल हिंदूंच्या प्रत्येक सणाविषयी काहीतरी खोड काढायचिच असं काही लोकांनी अगदी ठरवूनच ठेवलंय असं दिसतंय. आता कोणत्याही झाडाच्या फांद्या तोडणे किंवा झाड तोडणे हे चुकीचंच आहे पण वर्षातून एकदा वडाच्या फांद्या तोडल्या म्हणून पर्यावरचा फार मोठा ऱ्हास होत असेल अस तर नाही. वर्षभर झोपलेले पर्यावरणप्रेमी नेमके हिंदूंच्याच सणांना जागे होतात आणि ह्यांच्या सणांमुळे पर्यावरण किती आणि कस धोक्यात आहे हे दाखवून द्यायची त्यांच्यात जणू स्पर्धाच लागते.आता काही जण म्हणतील वडाच्या झाडाभोवती गुंडाळलेला धागा तसाच राहतो त्याने झाडाला त्रास होतो तर झाडावर नावे कोरल्याने सुद्धा झाडाला त्रास होतोच. आणि अजूनदेखील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालूच आहे त्याचा सुद्धा विचार होऊद्या उगाच विरोध म्हणून हिंदूंच्या प्रथा कशा पर्यावरणाला घातक आहेत हे दाखवून द्यायचा केविलवाणा प्रयत्न करू नका.
वडाच झाड पुजून नवऱ्याचं आयुष्य वाढत का अश्या आशयाच्या अनेक पोस्ट आज मी फेसाबुकवर पाहिल्या. त्यात कहर म्हणजे वडाची पूजा करणारी सावित्री लोकांना लवकर कळली पण विद्येचा वसा घेतलेली सावित्री लोकांना कळली नाही अशी एक पोस्ट पहिली. खरं तर पोस्ट करणाऱ्याची किव यावी इतका मूढ वाटला मला तो मनुष्य. मुळात ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत एक धार्मिक गोष्ट आहे ह्यात लोकांची श्रद्धा महत्वाची आहे. आणि दुसरी सामाजिक गोष्ट आहे.सावित्रीबाई फुले होत्या म्हणूनच आज आम्ही सुशिक्षित आहोत ह्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे. आणि त्या जर समजल्या नसत्या तर आज इतक्या प्रमाणात मुली शिकल्या असत्या का ? मग कशाच्या आधारावर सावित्रीबाई फुले लोकांना कळल्या नाहीत असं म्हटलं जातंय ?
मुळात कोणत्या दोन व्यक्तींची आपण तुलना करतो आहे ह्याच तरी भान असुद्या. दोघी पण आपआपल्या स्थानी श्रेष्ठच आहेत उगाच त्यांची तुलना करून त्यांचं श्रेष्ठत्व कमी करू नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात एका रेघेइतके अंतर आहे पण म्हणून प्रत्येक धार्मिक माणूस अंधश्रद्धाळू आहे असं तर नाही ना म्हणू शकत ? आता हा लेख वाचून देखील मला काही अतिशहाणे लोक नक्कीच मोफतचे सल्ले देतील कि घटनेने तुम्हाला अधिकार दिला म्हणून आज शिकलात म्हणून लिहताय, कमावताय , जगताय श्वास घेताय तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगून ठेवते मी घटनेचा आदर करते. पण म्हणून मी धार्मिक बाबींवर बोलायला लागल्यावर लगेच मला घटनेची आठवण करून द्यायची काही एक गरज नाहीय. आमच्या धार्मिक गोष्टी आम्ही अभिमानाने करणार आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणार देखील. त्यामुळे उगाच येऊन शहापणाचे धडे शिकवणाऱ्यानी स्वतः किती झाडे लावली किंवा पर्यावरणाचं किती भलं केलं ह्याचा आधी विचार करावा.
- स्नेहा शिंदे.