CRIME BORDER | 26 December 2025 | 05:59 PM
मुंबई :- शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकार कमी केल्याबाबत चर्चेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विधान परिषदेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. यावेळी चर्चेत सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.
अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस परवाना नाही - राज्यमंत्री डॉ.भोयर
एच टी बी टी बियाणे जप्त केल्याबाबत प्रश्नांना उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, जनुकीय बदल बियाणे विक्रीस परवाना देण्यात आले, पण कपाशी ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस परवाना नाही. आता सध्या राज्यामध्ये पेरणी हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात ‘एच टी बी टी’ बियाणे साठवणूक करण्यात येत असल्याच्या माहितीनुसार ‘एच टी बी टी’ बियाणे जप्त करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी ७ मार्च २०२५ रोजी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला दिले होते.
अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे जप्त केले आहे. त्या संबंधित बियाणे उत्पादकावर देखील गुन्हा दाखल केला आहे, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.