CRIME BORDER | 01 June 2026 | 02:16 PM
आज ०१ जून २०२६ रोजी तुझ्या ७० व्या वाढदिवसानिमित्त मन भरून आले आहे. शब्द सुचत नाहीत, कारण काही माणसांचे ऋण शब्दांत व्यक्त करता येत नाही. तू माझ्यासाठी फक्त मोठा भाऊ नाहीस, तर आयुष्यभर सावलीसारखा उभा राहिलेला आधारवड आहेस.
आपल्या वखरे कुटुंबाचे ते दिवस आजही डोळ्यांसमोर उभे राहतात. घरात अठरा विश्व दारिद्र्य, हाताला काम पण पोटाला भाकरीची भ्रांत. अशा परिस्थितीत अनेक जण परिस्थितीपुढे हार मानतात, पण तू हार मानली नाहीस. त्यानंतर बोदवडला मधुकर काकांच्या दुकानात कामासाठी सायकलवरून ये-जा करत होतास. दिवसभर कष्ट करून थकलेला असतानाही माझ्या हट्टासाठी मला सायकलवर बसवून रांजणी-जामठीच्या रस्त्याने फिरवायला न्यायचास. जामठीच्या बाजारातून येताना माझ्यासाठी दाह्या, पोहे, शेव, चिवडा आणायला कधी विसरत नव्हतास.
मी तुझ्या मागे धावत असायचो आणि तू माझ्यासाठी भविष्य घडवण्यासाठी पुढे धावत होतास. कदाचित त्या वेळी मला याची जाणीव नव्हती, पण आज समजते की त्या प्रत्येक कष्टामागे एका मोठ्या भावाचे प्रेम आणि त्याग दडलेला होता.
घरातील प्रत्येक जण राबत होता. आई, बाबा, बहिणी, आणि मथुरा वहिनी यांनी संसाराचा गाडा ओढण्यासाठी आपले आयुष्य झिजवले. त्याच काळात १९८० मध्ये सुरेखाचा जन्म झाला आणि जणू आपल्या घराच्या नशिबाला नवी पालवी फुटली. तुला नोकरीचा कॉल आला आणि बेटावद बुद्रुक हे गाव कायमचे मागे राहिले.
आयुष्यात कितीही वादळे आली, तरी तू कधी डगमगलास नाहीस. नियतीने तुला अनेक दुःख दिली. मथुरा वहिनी अर्ध्या संसारात तुझी साथ सोडून गेल्या, पण तू खचला नाहीस. स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून तू कायम कुटुंबाचा विचार करत राहिलास. पण मला आजही मथुरा वहिनींची आठवण येत नाही असे कधी होत नाही त्यांनी मला आईंची माया दिली.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे ऋण तुझे आहे. १९९८ साली सुरेखाच्या लग्नानंतर मला मुंबईत आणण्याचा निर्णय तु घेतला नसतास, तर कदाचित माझे आयुष्य कोणत्या वळणावर गेले असते हे सांगता आले नसते. आज मी जे काही आहे, ज्या सुखाचे आणि यशाचे दिवस पाहत आहे, त्याची पायाभरणी तू केलीस. हे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही.
मला आजही अभिमान वाटतो की तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा म्हणून मी पुढाकार घेऊन सरला वहिनींची निवड केली. १ जानेवारी २००० रोजी तुझा संसार पुन्हा नव्याने फुलला आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबाला एक नवीन उभारी मिळाली. सरला वहिनींनीही अत्यंत प्रेमाने आणि समर्पणाने घर सांभाळले, सर्वांना एकत्र ठेवले. त्यांच्याबद्दल मनात अपार आदर आहे.
सुरेखा, मीना, दिनकर, वैशाली, प्रकाश, कोमल, चिऊ, शिवम आणि सत्यम या सर्वांच्या आयुष्यात तू केवळ वडील किंवा भाऊ म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक म्हणून उभा राहिलास. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी झालास. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला प्रत्येकाला जमत नाही; ती देणगी तुला लाभली आहे.
भाऊ, तुझ्या स्वभावातील सर्वात मोठा गुण म्हणजे सहनशीलता. आयुष्यात इतके चढ-उतार पाहूनही तू कधी कोणावर रागावलास नाहीस, कुणाचा द्वेष केलास नाहीस. शांतपणे, संयमाने आणि प्रेमाने सर्वांना जोडून ठेवलेस. तुझ्या या विशाल मनाला माझा मनापासून मुजरा.
आज तुझा ७० वा वाढदिवस संपूर्ण कुटुंब आनंदाने साजरा करत आहे. हा क्षण पाहताना मन भरून येते. पण ठरवूनही या कार्यक्रमास आम्ही हजर राहू शकलो नाही याची खंत आहे. लाववकरच आपण भेटू या .
एकेकाळी गरिबीशी झुंज देणाऱ्या त्या वखरे कुटुंबाचा आजचा हा सुखाचा आणि समाधानाचा प्रवास तुझ्या कष्टांमुळे शक्य झाला आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना — तुला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो. आजचा हा ७० वा वाढदिवस शतायुषी प्रवासाची केवळ एक पायरी ठरो. आम्हाला तुझे प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद असेच लाभत राहोत.
भाऊ, तू आमच्या कुटुंबाचा अभिमान आहेस, आधार आहेस आणि प्रेरणा आहेस.
"काही नाती रक्ताने जुळतात, पण काही नाती त्याग, प्रेम आणि कर्तृत्वाने महान होतात. माझ्यासाठी 'प्रभाकर भाऊ' हे केवळ नाव नाही, तर संघर्ष, त्याग आणि प्रेमाचे जिवंत प्रतीक आहे."
तुझ्या चरणी कृतज्ञतेचा नम्र मुजरा.
तुझाच लहान भाऊ,
राजेंद्र 🙏❤️