CRIME BORDER | 14 June 2026 | 12:32 PM
नवी मुंबई, :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून 'शाहू विचारांचा जागर' या उपक्रमांतर्गत ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर एक विशेष स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे च्या मुंबई विभागीय कार्यालयामार्फत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
दि. ०६ जून २०२६ ते ०९ जून २०२६ या कालावधीत मुंबई विभागांतर्गत 'सारथी' संस्थेच्या अधिछात्रवृत्तीचा लाभ घेणाऱ्या संशोधक (पीएच.डी.) विद्यार्थ्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ऐतिहासिक वारसाचे जतन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव याद्वारे समाजात जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या मोहिमेदरम्यान रायगड, पालघर आणि मुंबई जिल्ह्यातील एकूण चार प्रमुख ऐतिहासिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. रायगड जिल्ह्यात कर्नाळा आणि रायगड किल्ला परिसरात स्नेहल पुंडे, विजय कुले, रंजीत मस्के व मयूर पारधी या विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. त्यांनी संपूर्ण परिसरातून प्लास्टिक, कागद आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून एकूण ०९ गोण्या कचरा संकलित केला.
पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक वसई किल्ला परिसराची स्वच्छता प्रतीक्षा जाधव, वैभव बिराजदार, तुषार मांडवकर, सुवर्णा साठे व प्रतीक भोसले या विद्यार्थ्यांनी केली आणि तेथून ०४ गोण्या कचरा बाहेर काढला. तर मुंबई जिल्ह्यातील सायन फोर्ट (सायन किल्ला) परिसरात दत्तात्रय काळे, स्नेहा पाटील व कोमल वांडूस्कर या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून ०४ गोण्या कचरा गोळा केला.
सारथीच्या या संशोधक विद्यार्थ्यांनी तिन्ही जिल्ह्यांतील ऐतिहासिक स्थळांवरून एकूण १७ गोण्या कचरा गोळा केला आणि या संकलित केलेल्या सर्व कचऱ्याची सुरक्षित व योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. 'सारथी'चे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अश्विनीकुमार पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागीय कार्यालयाने हा स्तुत्य उपक्रम यशस्वी केला. आगामी २६ जून रोजी होणाऱ्या छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कृतीतून दिलेला हा 'शाहू विचारांचा संदेश' अतिशय दिशादर्शक ठरला आहे.