CRIME BORDER | 29 July 2026 | 06:54 AM
नवी मुंबई, दि.२८ -:मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमधील प्रमुख धरण प्रकल्पांमध्ये समाधानकारक आणि मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. अनेक मोठी व मध्यम धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यातील बारवी या मोठ्या प्रकल्पात २६७.६७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. याच जिल्ह्यातील तानसा धरणात १४५.०८० दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध असून धरणातून ६६३१.५६ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भातसा या मोठ्या प्रकल्पात सर्वाधिक ८५१.४४३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून तेथून २९६.४० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर मोडकसागर धरणात १२८.९३ दशलक्ष घनमीटर साठा असून ६१३४ क्युसेक्स दराने पाणी सोडण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यातील धामणी या मोठ्या प्रकल्पात २१०.९०८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून ६५० घमी/सेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. याच जिल्ह्यातील कवडास प्रकल्पात ८.२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यात ५.१२ टीएमसी साठवण क्षमता असणारा हेटवणे मध्यम प्रकल्प आजपर्यंत ९१.५० टक्के भरला आहे. याशिवाय जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी तब्बल २३ प्रकल्प १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी मध्यम प्रकल्पात ६६.३९ दशलक्ष घनमीटर साठा असून ६१.६३ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. अर्जुना प्रकल्पात ७२.५६ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध आहे, तर नातूवाडी प्रकल्पात १८.३७७ दशलक्ष घनमीटर साठा असून ९.६१९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धरणांची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. जिल्ह्यातील तिलारी या मोठ्या प्रकल्पात ४४७.३६९ दशलक्ष घनमीटर मुबलक साठा असून ११६.२५ इतका विसर्ग सुरू आहे. अरुणा मध्यम प्रकल्पात ९२.०२५ दशलक्ष घनमीटर साठा व ११.९८ विसर्ग, कोरले-सातंडी प्रकल्पात २५.४७४ दशलक्ष घनमीटर साठा व १३३.६९ विसर्ग नोंदीत झाला आहे, तर देवघर मध्यम प्रकल्पात ९८.०२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजले असून नदी पात्राजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.