CRIME BORDER | 26 December 2025 | 06:59 PM
नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असले तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग (community transmission) झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे बोलले जात होते. यावर देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव (Balram Bhargav) यांनी म्हटले आहे.
डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, छोट्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे तर शहरी भागात हे प्रमाण फक्त एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही. आम्हाला आढळले आहे की छोट्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, शहरी भागात तो एक टक्क्यांपेक्षा थोडा जास्त असं भार्गव म्हणाले.