CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
Mumbai Pollution Diwali 2022 : पुढील दोन दिवस मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट राहण्याचा अंदाज 'सफर'तर्फे वर्तवण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर पावसाळी हवेमध्ये वाहून नेली जाणारी प्रदूषके हवेतच साचून राहतात. त्यातच सध्या फटाक्यांच्या प्रदूषणामुळे त्यात वाढ झाल्याने नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारी आणि त्या अनुषंगाने आरोग्याच्या इतर समस्याही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : धुराने कोंडलेला श्वास, रात्री दीड-दोनपर्यंत सुरू असलेले कानठळ्या बसवणारे फटाक्यांचे आवाज असा अनुभव सोमवारच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईकरांना आला. सोमवारच्या आतषबाजीनंतर मंगळवारीही मुंबईची हवा प्रदूषितच होती. प्रदूषणाचे हे प्रमाण आज, बुधवारीही असेच कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.सफर या प्रणालीनुसार मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३००च्या पुढे होता. दिवसभर तो २९०च्या आसपास राहिला होता. संध्याकाळच्या सुमारास मुंबईची हवा ही अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदली गेली. मंगळवारी दिल्लीची हवाही अतिवाईट श्रेणीमध्ये होती. दिल्लीचा गुणवत्ता निर्देशांक ३४९ होता. मुंबईमध्ये माझगाव, चेंबूर, वांद्रे कुर्ला संकुल, अंधेरी, मालाड येथे हवेची गुणवत्ता अतिवाईट होती. तर बोरिवली, कुलाबा येथे हवेची गुणवत्ता वाईट होती. भांडुप आणि वरळी येथे हवेचा दर्जा मध्यम स्वरूपाचा होता. अतिवाईट गुणवत्ता नोंदवलेल्या केंद्रावर पीएम २.५ या प्रदूषकासोबतच पीएम १० या प्रदूषकाचीही गुणवत्ता खालावली होती.
आवाज फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री उशिरा फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा अंदाज घेण्यात आला. यामध्ये शिवाजी पार्क येथे रात्री दहाच्या सुमारास १०३ डेसिबल, मरिन ड्राइव्ह येथे १०९ डेसिबल आवाजाची नोंद झाली. शिवाजी पार्क येथे रात्री १२ वाजता १०७ डेसिबलपर्यंत आवाज होता. दादर येथील रहिवाशांनी रात्री दोन-अडीचपर्यंत फटाक्यांचे आवाज सुरू होते, असे सांगितले. मुंबईच्या विविध भागांमधूनही रात्री उशिरापर्यंत आवाजी फटाके फोडले जात असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर करण्यात आल्या. जुहू, वांद्रे, वरळी येथील अनेक नागरिकांनी पोलिसांना फटाक्यांच्या आवाजाबद्दल तक्रारी केल्याचे आवाज फाऊंडेशतर्फे सांगण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ रात्री १०पर्यंत फटाके फोडायला परवानगी असताना वेळेच्य़ा बंधनाचे अनेक ठिकाणी उल्लंघन झाले.MT