CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, दि.10 सप्टेंबर : देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहिदांचं स्मरण केवळ राष्ट्रीय दिनांपुरतं मर्यादित न ठेवता, गेल्या तीन दशकांपासून एका शासकीय अधिकाऱ्याने आपल्या एकपात्री नाटिकेद्वारे देशभक्तीची मशाल तेवत ठेवली आहे. महाराष्ट्राचे राजपत्रित वर्ग-१ अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या 'शहीद कॅप्टन विनायक गोरे' या एकपात्री नाटिकेचा 13 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचा ५,००० वा प्रयोग त्यांच्याच महाविद्यालयात, के. जे. सोमैया कॉलेजमध्ये होणार आहे. हा केवळ एक नाट्यप्रयोग नसून, भारतीय सैन्याच्या वीर जवानांना वाहिलेली आदरांजली आणि राष्ट्रसेवेसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे.
१९९५ साली, वयाच्या २७ व्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये देशासाठी शहीद झालेल्या कॅप्टन विनायक गोरे यांच्या बलिदानाने संपूर्ण देशाला हळहळ लावली. त्यावेळी, सोमैया कॉलेजमध्ये शिकणारे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) कॅडेट असलेले मनोज सानप यांना हा धक्का खूप मोठा होता. आपल्या भारतीय सैन्यातील अधिकाऱ्याचे बलिदान विस्मृतीत जाऊ नये, या उदात्त भावनेतून त्यांनी एकपात्री नाटकाची निर्मिती केली. कॅप्टन गोरे यांच्या बलिदानाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी हा पहिला प्रयोग सादर केला आणि देशभक्तीच्या या अविश्रांत प्रवासाला सुरुवात झाली.
गेल्या ३० वर्षांपासून मनोज सानप हे शासकीय सेवेतील आपली कर्तव्ये पार पाडत असतानाच, या नाटिकेचे प्रयोग करत राहिले. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा किंवा पुरस्कारांचा हव्यास धरला नाही. केवळ शहीदांना आदरांजली वाहणे आणि देशातील तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे, हेच त्यांच्या प्रयोगांचे एकमेव उद्दिष्ट राहिले.
मनोज सानप त्यांच्या या कलाकृतीचा उपयोग केवळ सैन्यात भरती होण्याचा संदेश देण्यासाठीच करत नाहीत, तर त्यांच्या माध्यमातून ते प्रत्येक नागरिकाला राष्ट्र आणि समाजसेवा करण्याचे आवाहन करतात. रक्तदान, अवयवदान, ध्वज दिनाला मदत करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा आदर करणे, यांसारख्या सामाजिक कार्यांसाठीही ते लोकांना प्रोत्साहित करतात.
ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करत असलेले मनोज सानप हे येथील प्रसारमाध्यमांसाठी एक अधिकारी म्हणून नव्हे, तर एक प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अथक परिश्रमामुळे त्यांना अनेक मानसन्मान मिळाले असले, तरी त्यांच्यासाठी खरी कमाई ही प्रेक्षकांच्या हृदयात पेटलेली देशभक्तीची ज्योत आहे. एका विद्यार्थ्यापासून ते राष्ट्रप्रेमाचे प्रतीक बनलेल्या मनोज सानप यांचा हा प्रवास, एका व्यक्तीची तळमळ किती मोठा बदल घडवू शकते, याचा उत्तम पुरावा आहे.
13 सप्टेंबर रोजी होणारा ५,००० वा प्रयोग हा त्यांच्या कर्तृत्वाचा कळस असला, तरी तो त्यांच्या कार्याचा शेवट नाही. शहिदांचे स्मरण आणि राष्ट्रसेवा हे कार्य अविरत सुरू राहील, हाच संदेश यामधून दिला जात आहे.