CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे, : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तूकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक, पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळाला नसल्यास “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” लागू करण्यास मान्यता दिली आहे.
या योजनेमध्ये विद्यार्थ्यांस भोजन, निवास या सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी तसेच निर्वाह भत्त्यासाठी रु.३८ हजार ते रु.६० हजार पर्यंत रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती(धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू आहे. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांस इयत्ता १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तसेच विद्यार्थी हा वसतीगृह प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, पालकाचे उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्याचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान ७५ टक्के असावी आदी प्रमुख निकष / पात्रता आहे.
या योजनेसाठी उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज दि.१५जुले २०२४ पर्यंत तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि.२०ऑगस्ट२०२४ पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ४ था मजला, दत्तवाडी, खारेगाव, कळवा, जि. ठाणे. ४००६०५ येथे आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क साधावा तसेच विद्यार्थ्यांनी योजनेचा अर्ज मिळविण्यासाठी खाली दिलेला क्यू-आर कोड स्कॅन करुन आवश्यक कागदपत्रांसह विहीत मुदतीत सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे चे सहायक संचालक समाधान इंगळे यांनी केले आहे.