CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
एलआयजी कोकण वसाहतीचा पंचनामा मालिका - भाग ०१ -
एलआयजी १, कोकण वसाहतीतील रहिवाशांच्या सहनशीलतेचा कडेलोट, १४ वर्षापासून घराच्या प्रतीक्षेत, बिल्डरची मनमानी, उद्या ७ जानेवारी पासून सोसायटीचे माजी अध्यक्ष वसंत खापरे व सभासद सामाजिक कार्यकर्ते गणेश कोते यांच्या नेतृत्वाखाली उपोषण
कल्याण (कार्यालय प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेत म्हाडाच्या वसाहती आहेत .त्यामध्ये एलआयजी ,एमआयजी, एचआयजी, EWS अशा वसाहती आहेत. त्यापैकी एलआयजी कोकण वसाहती मध्ये एकूण ४४८ सदनिका धारक गुण्यागोविंदाने नांदत होते परंतु पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या १४ वर्षापासून येथील रहिवासी बाहेर आहेत. सदर वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी सर्व संमतीने पटेल ग्रुप अँड कंपनी यांनी तो गृह प्रकल्प हाती घेतला. त्याचे कामही सुरू झाले परंतु विविध कारणांनी हा प्रकल्प रखडत असून या वसाहती मधील बरेच जण हे आपल्या हक्काच्या घरात जाण्या अगोदरच देवाघरी गेले आहेत. अनेक वेळा बिल्डर सोबत रहिवाशांच्या मीटिंग झाल्या बिल्डर यांनी फक्त आश्वासने दिली परंतु काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. असा रहिवाशांचा आरोप आहे.
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सदर बिल्डर यांना सोसायटीने या प्रकल्पापासून कोर्टाच्या माध्यमातून दूर ठेवले होते. पुन्हा समजोता होऊन उच्च न्यायालयातून सदर जमिनीचा ताबा पुनर्विकासासाठी बिल्डर यांना देण्यात आला . कामाची प्रगती नसल्याने रहिवाशांमध्ये संताप उसळत आहे .सदर प्रकरणी रहिवाशांनी विविध राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेतल्या परंतु सदर काम हे पूर्ण होत नसल्याने या सोसायटीचे माजी अध्यक्ष वसंत कारभारी खापरे व सभासद सामाजिक कार्यकर्ते गणेश कोते हे उद्या दिनांक ७ जानेवारी २०२४ पासून कोकण वसाहतीच्या जागेमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत .यासाठी रहिवाशांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला असून आता कोकण वसाहती मधील सदनिका धारक यांच्यामध्ये ठिणगी पेटली असून हा वनवा पेटायला वेळ लागणार नाही.
यासंदर्भात कल्याणचे आमदार श्री. विश्वनाथ भोईर, या विभागाच्या मा. नगरसेविका सौ.नीलिमा संजय पाटील , संस्थेचे सल्लागार श्री.संजय पाटील, पटेल अँड ग्रुप कंपनीचे प्रेसिडेंट श्री हसमुखभाई पटेल तसेच एलआयजी कोकण वसाहत १ चे अध्यक्ष व सेक्रेटरी त्याचबरोबर कल्याण विभागाचे एसीपी श्री. कल्याणजी घेटे व महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शैलेश साळवी यांना उपोषणा संदर्भात पत्र सादर करण्यात आलेली आहेत.जर का याच्यावर लवकर तोडगा निघाला नाही तर प्रत्येक घरातून एक व्यक्ती जरी उपोषण स्थळी बसली तरी मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो .यासाठी तातडीने प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.
यासंदर्भात क्राईम बॉर्डरची टीम उपोषण कर्ते व पटेल अँड ग्रुप कंपनीचे संचालक हसमुख भाई पटेल व एलआयजी १, कोकण वसाहत मधील रहिवाशांच्या प्रतिक्रिया घेऊन सदर घटनेला वाचा फोडण्याचे काम करणार आहे
मालिका भाग ०१